‘उमलत्या बूचफुलांचा सुगंध!चारुदत्त हा कोण कोठुनी
अंगावरला फेकित शेला
वसंतसेना वसुंधरेने
झेलुन तो हृदयाशी धरला!’
अशा अनोख्या शब्दकळेने स्त्रीमनाची मूक स्पंदने समर्थपणे शब्दबद्ध करणाऱ्या कवयित्री इंदिरा संत यांचा आज (चार जानेवारी) जन्मदिन.
बेळगावमध्ये राहून अध्यापकी करतानाच इंदिराबाईंनी आपले हळवे स्त्रीमन तितक्याच हळव्या शब्दांत कागदावर उतरवले. ‘उंच उंच माझा झोका’ किंवा ‘नको नको रे पावसा नको धिंगाणा अवेळी’ अशा कविता साकारताना त्यांच्या मनात लपलेले निसर्गप्रेम उफाळून बाहेर येते.
इंदिराबाईंनी नारायण संत या तितक्याच प्रतिभावंत कवीबरोबर विवाह केला. १९४०मध्ये त्यांचा ‘सहवास’ हा संयुक्त कवितासंग्रह प्रकाशित झाला. हा एक नवा प्रयोग त्यांनी केला.
१९४६मध्ये इंदिराबाईंना पतिविरहाचे दु:ख सोसावे लागले. त्या खचल्या, पण सावरल्या. माझ्या कवितेने मला सोबत केली, असे त्या म्हणत.
चाफ्याच्या झाडा
चाफ्याच्या झाडा।।
मला काय कळतंय
कळतंय ना ।।
अशा पंक्ती त्या लिहू लागल्या. आपली वेदना चाफ्याच्या झाडापाशी उघडी करू लागल्या.
इचलकरंजीतील साहित्य संमेलनात इंदिराबाईंच्या कविता त्यांच्याच तोंडून ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते.
इंदिराबाईंनी १३ जुलै २००० ला आपला जीवनप्रवास संपवला; पण कवितेच्या निर्मितीचे इंगित मात्र त्यांच्या मनाच्या खोल कप्प्यातच दडून राहिले.
आज त्यांची ही त्या मानाने कमी प्रसिद्ध, पण अर्थगर्भ कविता ओठांवर येते.
इथे वेदना लालतांबडी;
इथे बधिरताच संगमरवरी;
इथे उकळते रक्त तापुनी,
बेहोषी अन् येथे काळी.
दुखणे बसले चिंध्या फाडित.
गरगर फिरती त्याचे डोळे
नसांनसातुन.
घुमते त्याचे हास्य भयानक
उरल्यासुरल्या रक्त कणांतुन
समोर त्याच्या
करते नर्तन... एक आठवण
त्या प्रलयाची.
हे कथ्थक... त्या मुद्रा...
अन् ते खर्जातले कंपन.
इंदिराबाईंच्या हळव्या व तरल काव्यप्रतिभेस आदरांजली!
- भारतकुमार राऊत